Thursday, September 19, 2019

लकी अली - ओरिजिनल पॉपस्टार


 

आज आवडता गायक लकी अली चा ६१ वा वाढदिवस. अतिशय वेगळ्या प्रकारचा आवाज लाभलेला असा हा गायक, आपल्या विरस आवाजात गाणी गात नव्वदच्या दशकातल्या अख्ख्या पिढीला त्याने मंत्रमुग्ध केलं आहे. इतर समवयस्क गायकांच्या तुलनेत त्याने मोजकच काम केलं आहे, पण जे काम केलंय ते अव्वल दर्जाचं आहे.

नव्वदच्या दशकात भारतात पॉप संगीताला सोन्याचे दिवस होते त्यात लकी अली हे एक नावाजलेले असं नाव होतं. त्याचा पहिला पॉप अल्बम सुनोह मधलं "ओ सनम" हे गाणं आजही भारताच्या पॉप संगीताच्या इतिहासात टॉप ला असलेल्या गाण्यांपैकी एक आहे. देखा है ऐसे भी, एक पल मे है जिंदगी, कभी ऐसा लगता है, कितनी हसीन है जिंदगी ही ही त्याची पॉप अल्बम मधली गाणी आजही फ्रेश आहेत. चित्रपटात त्याने त्यामानाने कमीच गाणी गायली आहेत, त्याची खरी आवड पॉप संगीतात स्वतःच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार झालेली गाणी गाण्याकडेच राहिली आहे. कविता कृष्णमूर्ती सोबत त्याने गायलेलं "गोरी तेरी आखे" आजही तितकच क्लासीक आहे. ७०च्या दशकातील 'एक बाप छे बेटे' या सिनेमात "Walking All Alone" हे पूर्ण इंग्रजी मध्ये असलेलं गाणं गाऊन त्याने पदार्पण केलं. ऋतिकच्या पदार्पणात म्हणजेच 'कहो ना प्यार है' मध्ये त्यानी दोन गाणी गायली "एक पल का जीना" आणि "ना तुम जानो ना हम", या सिनेमासाठी त्या वर्षांचं उत्कृष्ट गायकाचं फिल्मफेअर त्याला मिळालं होतं. त्याच्या वडिलांची (मेहमूद) इच्छा होती की त्याने अभिनय करावा, म्हणून "काटे" "कसक" आणि "सुर" या सिनेमांमधून त्याने अभिनय करून वडिलांची इच्छा पूर्ण केली. पुढे त्याच्या स्वतःच्या अल्बम सोबतच "युवा", "पाठशाला", "बचना ऐ हसीनो", "अंजना अंजनी" या सिनेमातली त्याची गाणी गाजली. हिंदी चित्रपटात त्याचं शेवटचं गाणं २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' मधलं "सफरनामा" हे होतं.

आज लकी अली चित्रपटात गाण्याचे ऐवजी बंगलोर पासून जवळच असलेल्या गावी पोल्ट्री फार्म तसेच कार्पेट चा कारखाना चालवतो आहे. त्याने मागे मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधल्या सध्याच्या गाण्यांचा दर्जा पाहून त्यानेच स्वतःहून चित्रपटात गाणी जायचं कमी केलं आहे. पण आजही तो लाईव्ह कॉन्सर्ट करतो, आणि अर्थातच त्या हाऊसफुल असतातच. 

अशा या आपल्या ओरीजनल पॉपस्टार ला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...

शुभम शांताराम विसपुते

Tuesday, September 17, 2019

रोहित शर्मा - भारतीय कसोटी संघाचा नवा सलामीवीर



मॉडर्न क्रिकेटमधला सर्वोत्तम सलामीवीर. इतक्या वर्षांपासूनची त्याला कसोटी मध्ये सलामीला खेळताना पाहण्याची इच्छा आता पुरी होत आहे. येत्या २ ऑक्टोबर पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीत तो नव्या भूमिकेत म्हणजेच सलामीला खेळताना दिसेल. या उशिरा सुचलेल्या शहाणपणासाठी रवी शास्त्री आणि कोहलीचे आभार.

२००७ मध्ये जरी पदार्पण झालेलं असलं तरी रोहितची खरी ईनिंग २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो पहिल्यांदा सलामीला आला तेव्हा सुरु झाली. त्या अगोदर संघात पदार्पण होऊन तब्बल ६ वर्ष झाली होती पण हवा तसा सूर काही त्याला गवसलेला नव्हता. बरं त्याच्यात गुणवत्ता नव्हती असंही नाही किंबहुना इतरांपेक्षा जरा जास्तच गुणवत्ता त्याच्यात ठासून भरलेली होती. पण त्या गुणवत्तेला न्याय मिळेल अशी कामगिरी काही त्याच्याकडून होत न्हवती. त्याला एक वर्षांनी जुनिअर असलेला कोहली (पदार्पण २००८) भस्म्या झाल्यासाखं धावा खात होता आणि दुसरीकडे याचा संघर्ष सुरूच होता. मला कोहली पेक्षा रोहित आवडतो अगदी तो फॉर्मसाठी झगडत होता त्या काळापासून, याच्यासाठी मित्रांच्या नेहमीच शिव्या खाल्ल्या आहे. लोक चमत्काराला नमस्कार करतात या उक्तीप्रमाणे आमच्या मित्रांमध्ये कोहली चा फॅनबेस जबरदस्त होता. तरी मी एकटा शस्त्र न टाकता त्यांच्याशी रोहितकरता लढलो आहे. आज उशिरा का होईना त्याने आमच्या सारख्या फॅन्स नि त्याच्यासाठी केलेल्या लढाईला जागत तुफान खेळतोय हे पाहून खरंच एक समाधान वाटतं.

त्याच्यात खऱ्या अर्थाने बदल झाला तो म्हणजे २०११ साली भारतात झालेल्या विश्वचषकासाठी त्याची संघात निवड न होणे. याचा जबरदस्त आघात त्याच्यावर झाला. कारण वानखेडे या त्याच्या घरच्या मैदानावर भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि तेव्हा याला तो क्षण मैदानात न साजरा करता घरी टीव्ही वर बघून समाधानी व्हावं लागलं. हिच वेळ होती, स्वतःच नेमकं कुठं चुकतंय याचा प्रतिशोध घेण्याची, स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची याकामी प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला मोलाची मदत केली. यानंतर जबरदस्त मेहनत घेऊन त्याने आपल्या चुका सुधारल्या, खेळपट्ट्टीवर जास्तीत जास्त वेळ तो उभा राहू लागला. सुरुवातीलाच मोठे फटके खेळण्यापेक्षा संथ सुरुवात करून नंतर फटक्यांची आतषबाजी त्याने सुरु केली. याचा परिणाम दिसला तो २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेहवाग, गंभीर हे नेहमीचे सलामीवीर संघात नसल्यामुळे एक प्रयोग म्हणून नवख्या शिखर धवन बरोबर त्याला सलामीला पाठविण्यात आलं, आणि पुढचा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे.

अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्यात एकदिवसीय सामन्यातील वैयक्तिक सर्वोच्च धावा २६४ धावा, एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके (२०९ वि ऑस्ट्रेलिया २०१३), (२६४  वि. श्रीलंका २०१४) (२०८ वि श्रीलंका २०१७), आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीत सर्वाधिक धावा, शतके आणि षटकार, २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक पाच शतकांसह तब्ब्ल ६४८ धावा, या विक्रमांबरोबरच अनेक नवनवीन विक्रम तो पादांक्रांत करतोय.

काही क्षण रोहित ने दिले आहेत जे आयुष्यभर लक्षात राहतील. २००७ च्या टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलमान बटचा पॉईंटला उभ्या असणाऱ्या रोहितने उलट्या बाजूला झेप घेत पकडलेला निव्वळ अफलातून असा झेल. २६४ धावांच्या खेळीदरम्यान त्याने मिड विकेटला फक्त फ्लिक करून मारलेलाा अप्रतिम षटकार,  २०१५ च्या विश्वचषकात क्वार्टर फायनल ला बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकी खेळी दरम्यान रुबेला हुसेन च्या योर्करवर सरळ मारलेला षटकार, २०१९ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला षटकार २००३ साली पाकिस्तानरुद्धच सचिन ने मारलेल्या षटकाराची आठवण करून गेला. याच विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यात रोहितने स्टोक्सला लागोपाठ तीन चौकार मारले होते. त्यातला दुसरा स्क्वेअर ड्राइव्ह ला मारलेला चौकार तर मी जन्मात विसरणार नाही. त्या फटक्याने वेगात बंदुकीच्या गोळीला हरवलं असतं. सीमारेषेवरचा क्षेत्ररक्षक हा फक्त आणि फक्त प्रेक्षक होता.

आता तो कसोटीत सलामीवीराच्या नव्या भूमिकेत येतोय. ज्या प्रकारे कसोटीत एडन गार्डन वर शतक मारून झोकात पदार्पण केलं होत अगदी तीच अपेक्षा त्याच्याकडून आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत असेल. बाकी तो नेहमीच आवडता राहील खेळों अथवा न खेळों.

शुभम शांताराम विसपुते

नरेंद्र दामोदरदास मोदी




गुजरात मधल्या वडनगर येथे जन्म, हलाखीच्या परिस्थितीमुळे रेल्वेत विकावा लागलेला चहा, लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक, पुढे तरुणपणी संघाचे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य, नंतर संघानेच आदेश दिल्यामुळे काहीश्या अनिच्छेने भारतीय जनता पक्षाचे कार्य करण्यासाठी राजकारणात प्रवेश, पुढे सलग १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता गेल्या ६ वर्षांपासून भारतदेशाचे लाडके पंतप्रधान असा विलक्षण यशस्वी प्रवास केलेले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आज वयाची ६९ वर्ष पूर्ण करून सत्तरीत प्रवेश करताय.

लौकिकार्थाने कुठलाही अनुभव नसताना मोदी राजकारणात आले. आता कदाचित खोटे वाटेल पण राजकारणात येण्याची त्यांची इच्छा नव्हती, संघाचे प्रचारक म्हणूनच त्यांना कार्य करायचे होते. पण संघसंस्कार असल्यामुळे संघाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून ते राजकारणात आले. प्रथम संघटनात्मक काम केले. मग त्यांना भाजपाने मुख्यमंत्री म्हणून काम करायला सांगितले, आजच्या तारखेत देशातील सर्वात यशस्वी राजकारण्यांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमावर आहे. भारत देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करीत आहे. पूर्ण राजकीय कारकीर्द सत्तेच्या अग्रक्रमावर राहूनही भ्रष्टाचाराचा, गैरव्यवहाराचा साधा एकही आरोप आजवर झालेला नाही आहे. यातच त्यांच्यातील यशस्वी नेत्याची छाप दिसते. 

आज खंबीरपणे भारतदेश त्यांच्या नेतृत्वाखाली जगात उभा आहे. "राष्ट्राय स्वाहा, इदम न मम" ही भावना असते तेंव्हाच इतकी मनाची स्थिति होते, दैव बलवत्तर असावे लागतेच पण आपण स्वत: पण खंबीर पणे उभे रहावे लागते. सांगितलेले काम स्वीकारून ते निष्ठेने करण्याची मनाची समतानता असावी लागते. हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे.

चरैवेती चरैवेती, यही तो मंत्र है अपना।
नही थकना, नही रुकना,
सतत चलना, सतत चलना।।

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब...!!!

शुभम शांताराम विसपुते 

Sunday, September 15, 2019

के के - दुर्लक्षित राहिलेला प्रतिभावान गायक






कृष्णकुमार कुन्नथ हा मूळचा मल्याळी पण दिल्लीत जन्मलेला गायक. कमालीची प्रतिभा असलेला पण त्या प्रतिभेला न्याय मिळेल इतकी संधी आणि प्रसिद्धी न मिळालेला हा गायक. माझा मित्र अजय इंगळेचा खास आवडता आहे, तसा तो माझाही आवडता आहेच पण अजयचा जरा जास्तच. माझं तुलनेनं थोडं जास्त प्रेम लकी अली वर आहे तर अजयच के के वर. के के वर लिहायला कारणीभूत अजयच आहे.

सुरुवातीच्या काळात तब्बल ३५०० जिंगल्स त्याने टीव्हीवरच्या जाहिरातींसाठी गायल्या आहेत. जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारची गाणी त्याने गायली आहे. त्याची खासियत म्हणजे काळीज चिरत जाणारी विरह गीते तो नेहमीच कमाल गातो. त्याच वैयक्तिक आयुष्य इतकं उत्तम असताना, म्हणजे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी बालपणापासूनची प्रेयसी असलेल्या मुलीसोबत त्याच लग्न झालय. दोन मुलंही त्याला आहे. इतकं सगळं व्यवस्थित असताना तो विरह गीते इतके अप्रतिम कशी काय गातो हे खरंच न सुटणार कोड आहे. के के च्या गायकीच आणखी एक वैशिट्य आहे, त्याची मूळ भाषा हिंदी नसताना देखील इतकं स्पष्ट आणि खणखणीत उच्चारासहित हिंदी मध्ये त्याला गाताना बघून आजच्या काळातील अरिजित, मिका यांची दया येते. 

सलमानच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असलेला  "हम दिल दे चुके सनम" मधे त्याने एकच गाणं गायलं होत. पण आजही तेच सगळ्यांच्या मनात आहे. ते म्हणजे "तडप तडप के इस दिल से" या एका गाण्याने के के च बॉलीवूड मध्ये झोकात पदार्पण झालं. के के ने यात काळीज पिळवटून टाकणारा जो आर्त स्वर यात लावलाय त्याला शब्दांच्या कोंदणात नाही बसवू शकत. खासकरून दुसऱ्या कडव्यात "अगर मिले खुदा तो" मध्ये जो काही सूर त्याने लावलाय त्यामुळे ऐश्वर्या सलमानला सोडून न जाता यालाच सोडून जातेय असं वाटावं इतका सच्चेपणा त्याने गाण्यात दाखवलाय. इम्रान हाश्मी त्याच्यावर चित्रित झालेल्या उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखला जातो  किंबहुना इम्रानच्या यशस्वी कारकिर्दीत त्याच्यावर चित्रित झालेली गाणी यांचा मोठा वाटा आहे. के के हाच इम्रानच्या बहुतांशी सिनेमात (गँगस्टर, अक्सर, जन्नत १ आणि २, आशिक बनाया आपने, द किलर इ.) त्याचा पडद्यावरचा आवाज झालाय. दोघांनी एकमेकांना पूरक राहून आपली कारकीर्द यशस्वी बनवली आहे. गँगस्टर मधलं "तू हि मेरी शब हे" मधलं दुसऱ्या कडव्यात आँखे 'तेरी शबनमी' हे रिपीट गाताना त्याने हलकीशी हरकत घेतली आहे. त्या हरकतीच वर्णन कुठल्या शब्दात करणार ? "ओम शांती ओम" मधलं 'आँखो मे 'तेरी' गाताना तो साक्षात स्वर्ग उभा करतो. इथे थोडे पॉईंट्स फराह खान ला ही द्यायला हवे तिने या गाण्याचं खूप सुंदर असं चित्रीकरण केलंय. "लाईफ इन मेट्रो" मधली के के ने गायलेली 'ओ मेरी जान' आणि 'अलविदा' हि दोघी गाणी त्या अलबम ची हायलाईट गाणी होती. "काईट्स" मध्ये 'दिल क्यो ये मेरा' आणि 'जिंदगी दो पल की' मध्ये ह्रितिक आणि के के कॉम्बो अफलातून जमून आलाय. पुढे ह्रितिकसोबतच आलेलं बसल्या जागी घायाळ करणार "गुझारीश" मधलं 'बस इतनी सी तुमसे गुझारिश हे' हे संथ लयीतील अप्रतिम गाणं. "दिल चाहता है" मध्ये 'कोई कहे केहता रहे' या गाण्यात शान आणि शंकर महादेवन असतानाही के के लक्षात राहतो. 

के के आजही प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहतो. वर्षभरात चित्रपटात एखाददुसरं गाणं गाऊन, देशविदेशात शो करतो. उरलेल्या वेळात पार्ट्या किंवा रिऍलिटी शो मध्ये जज बनण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. आज के के ने वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केलय पण ५० हा त्याच्यासाठी फक्त एक आकडा आहे . आयुष्यात ज्या गायकांचा शो लाईव्ह बघण्याची मनापासून इच्छा आहे त्यात के के आणि लकी अली ही दोनचं नाव आहे.

के के च्या नवीन येणाऱ्या गाण्याची वाट बघणं किंवा मग त्याची जुनी गाणी एकूण कुणाच्या तरी आठवणीत रमून जावं... बस्स आपल्या हातात याहून जास्त तरी काय आहे...

शुभम शांताराम विसपुते

रॉकस्टार - म्युझिकल मास्टरपीस





११/११/११ या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला "रॉकस्टार" हा खऱ्या अर्थाने एक इम्तियाझ अलीचा मास्टरपीस असा सिनेमा. माझ्या ऑल टाइम फेव्हरेट चित्रपटांपैकी एक आहे. लहानपनापासून रॉकस्टार बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या नायकाचा विलक्षण प्रवासाची सफर हा चित्रपट आपल्याला घडवतो. रणबीर कपूर आणि इम्तियाझ अली हे "क्लासेस" चे लाडके होतेच, पण रॉकस्टार मुळे ते "मासेस" चे पण लाडके झाले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच रणबीरने त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिलाय. म्युझिकल सिनेमामध्ये गोष्ट हि गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकते. अश्या सिनेमात गाणी हि एक महत्वाची भूमिका बजावत असतात. रॉकस्टार या बाबतीत पूर्णपणे यशस्वी झालाय. रहमानच वेड लावणार संगीत, इर्शाद कामिल चे अफलातून शब्द आणि मोहित चौहानचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे रॉकस्टार हा अल्बम जबरदस्त जमून आलाय. रॉकस्टार ची गाणी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यासाठीच हा लेखनप्रपंच...

१) जो भी मै - सिनेमाची सुरुवातच या गाण्याने होते, जनार्दन जाखड उर्फ जे जे (रणबीर कपूर) च सुरुवातीच्या काळातील व्यक्तिमत्व या गाण्याच्या माध्यमातून उलगडत जात. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचत नाहीए किंवा योग्य प्रकारे व्यक्त होता येत नाही आहे. अशा पार्श्वभूमीच हे गाणं. फ्लॅशबॅक च्या माध्यमातून जे जे ला अनेक ठिकाणी गाताना यात दाखवलं गेलं आहे.

२) टॅंगो फॉर ताज (Instrumental) - सिनेमाची नायिका हीर (नर्गिस फाखरी) हिच्या एंट्रीला हा मुसिकल पीस वाजतो. कॉलेज क्वीन असलेली हीर चा कॉलेज मधला हा शेवटचा परफॉर्मन्स असतो, कारण तीच लग्न ठरलेलं असत. याच गाण्यात जे जे ला कॉलेज कॅन्टीन मधल्या खटाना भाई (कुमुद मिश्रा)  ने सांगितलेलं "टुटे हुए दिल से हि संगीत निकलता है" हा मंत्र डोक्यात असतानाच त्याचा मित्र हीर ला नाचताना बघून म्हणतो "ये तो दिल तोडणे कि मशीन है" हे एक वाक्य जे जे च्या आयुष्यात हीर ला आणायला कारणीभूत ठरत. 

३) कतिया करूं - मोठे प्रयत्न केल्यानंतर जे जे ची हीर सोबत मैत्री होते. हीर च्या लग्नाला पण थोडेच दिवस शिल्लक असतात. तोवर मौजमजा करण्यासाठी हीर जे जे च्या सोबत आपल्या सगळ्या फँटसिस (सी ग्रेड सिनेमे बघणं, देशी दारू पिणं इ.) पूर्ण करते. ह्या गाण्यात जे जे आणि हीर दोघांमध्येही अगदी निकटची मैत्री होते.जे जे हीर च्या लग्नाला काश्मीरलाही जातो, तिथे हीर तिच्या मित्रांना जे जे ची ओळख करून देताना त्याच नाव "जॉर्डन" असं सांगते. हीर जॉर्डन मध्ये गुंतत जात असते पण वेळीच स्वतःला सावरून लग्न करून, विदेशात निघून जाते.

मूळच पंजाबी लोकगीत असलेल्या गाण्याला रहमानचा मिडास टच लागल्यामुळे गाणं उत्तम झालं आहे. रहमान ने हे गाणं हर्षदीप कौर आणि सपना अवस्थी या दोन गुणी गायिकांकडून गाउन घेतलय. गाणं श्रवणीय आहे तसच ते काश्मीरच्या पार्शवभूमीवर चित्रित झाल्यामुळे प्रेक्षणीय हि झालय. 

४) फिर से उड चला - जॉर्डन  हीर च्या लग्नाहून परत येत असताना हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत असत. याच गाण्यात फ्लॅशबॅकमधून जे जे आता कॉलेजला होता तसा बावळट न राहता बऱ्यापैकी मोठा गायक झालेला दाखवला आहे. अजूनही बरीच मोठी गोष्ट आहे जी फ्लॅशबॅकच्या माध्यमातून उलगडत जाते.

५) कुन फाया कुन - दरम्यानच्या काळात घरी झालेल्या वादामुळे घरातून हाकलून दिल्याने जवळपास दोन महिन्यांनी भग्न अवस्थेत जॉर्डन खटाना भाई च्या घरी जातो, तेव्हा खटाना त्याला विचारतो कि दोन महिने कुठे होता तेव्हा जॉर्डन सांगतो कि तो हजरत निझामुद्दीन च्या दर्ग्यावर होता. खटाना त्याला विचारतो कि दर्ग्यावर दोन महिने काहीतरी तर केलं असेल, तेव्हाच पार्श्वभागावर हे गाणं सुरु होत. जॉर्डन चा दर्ग्यावरचा दोन महिन्यातला प्रवास या गाण्यात दाखवला जातो. दर्ग्यात गाणं म्हणणाऱ्या कलावंतांसोबत आपली गायनाची सेवा तो हजरत निझामुद्दीन ला अर्पण करतो. इथेच शहनाईवादक उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) यांची नजर जॉर्डन वर पडते.

रहमान जेव्हा हि सुफी किंवा भजन हे ईश्वराकडे घेऊन जाणाऱ्या प्रकारातील गाणे बनवतो तेव्हा तो आपल्याला येणार सर्वोत्तम काम त्या गाण्यात देत असतो, अगदी तल्लीन होऊन ऐकावं असं हे गाणं झालय. मोहित चौहान हा मुख्य गायक आहेच पण त्याला साथ द्यायला जावेद अली आणि दस्तरखुद्द रहमानही आहे. 

६) शेहेर मै - खटाना ने मोठ्या प्रयत्नाने जॉर्डन ला प्लॅटिनम म्युझिक च्या रेकॉर्डिंगला ला घेऊन जातो, पण काही केल्या जॉर्डन कडून हे रेकॉर्डिंग पूर्ण होत नाही. रेकॉर्डिंग मधून बाहेर निघताना स्टुडिओ मध्ये उस्ताद जमील खान यांना जॉर्डन दिसतो. प्लॅटिनम  म्युझिक चा मालक धिंग्रा (पियुष मिश्रा) याच्या ऑफिस मध्ये ते जॉर्डन ला बोलावून घेतात, तिथे आपली ओळख सांगतात आणि धिंग्रा ला जॉर्डन ला घेऊन अल्बम करायला लावतात. अल्बम हिट होतो, धिंग्रा जॉर्डन ला युरोप टूर वर घेऊन जातो. हीर सुद्धा "प्राग" येथे राहत असते. हीर आणि जॉर्डन ची प्राग मध्ये परत एकदा भेट होते.

चित्रपटात शेहेर मै या गाण्याचा अगदीच थोडासा भाग दाखविला आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गाण्याचा प्रयत्न करणारा पण काहीकेल्या गाणं रेकॉर्ड करायला न जमणारा जॉर्डन यात दिसतो. दक्षिण भारतातला गायक कार्तिक ने मोहित चौहान सोबत हे गाणं गायलंय.  

७) हवा हवा - प्राग मध्ये जॉर्डन हीर ला भेटतो. लग्नानंतर हीरच जीवन निरस झालेलं असत. त्यात जॉर्डन आल्यामुळे हीर ला परत आपलं पूर्वायुष्य नव्याने जगायची संधी मिळते. दोघीही परत मौजमजा करतात. आता जॉर्डन आणि हीर दोंघांमध्येही जवळीक वाढत जाते. हीर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. पण जॉर्डन हट्टाला पेटलेला असल्यामुळे नाही दूर करू शकत, तिलाही त्याचा सहवास आवडू लागलेला असतो.

 या गाण्यात एका राजा राणी ची गोष्ट सांगितली आहे. त्यातली राणी ही बंदिवाणासारखं आयुष्य जगतेय. हि गोष्ट तंतोतंत हीर च्या जीवनाशी प्रेरित आहे. प्राग शहरात चित्रित झालेल्या जा गाण्यात तिथल निसर्गसौंदर्य, बार, स्थानिक नृत्य यांची झलक बघायला मिळते. 
 
८) और हो - सिनेमातील हे एकमेव विरह गीत. हीर ला जॉर्डन पासून दूर जायचं नसत, पण स्वतःच्या वैवाहिक जीवनात अडचणी यायला नको म्हणून स्वतः हीर इच्छा नसताना जॉर्डन पासून दूर होते. जॉर्डन हि भारतात परत यायला निघतो. पण विमानतळावरून शेवटचं हीर ला भेटावं म्हणून विनापरवानगी तिच्या घरात प्रवेश करतो आणि सायरन वाजल्यामुळे घरातल्या सगळ्यांना कळत आणि ते जॉर्डन ला पोलिसांच्या ताब्यात देतात. प्राग मध्ये जॉर्डन ला तुरुंगवास भोगावा लागतो. पण भारतात त्याच प्रत्यार्पण झाल्यामुळे त्याला भारतात आल्याबरोबर अटक केली जाते.

ह्या गाण्यात इर्शाद कामिल ने अफलातून शब्द लिहले आहे. काळजात खोलवर काही तुटले आहे अशी भावना हे गाणं ऐकताना होते. रहमान ने या गाण्याला ऑपेरा स्टाईल टच दिला असल्यामुळे ते वेगळ्याच उंचीवर पोहचलं आहे. अल्मा फेव्हरिक या गायिकेने मोहित चौहान ला कमालीची साथ या गाण्यात दिली आहे.

९) सडा हक - भारतात अटकेत असलेला जे जे. त्याची नकारात्मक पब्लिसिटी सगळीकडे होते आहे. मीडिया, धिंग्रा सर्व आपापला स्वार्थ साधत आहे. फक्त खटाना भाई प्रामाणिकपणे त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. 

मुळातच बंडखोरीला प्रोत्साहन देणार हे गाणं, जॉर्डन भारतात जे जे विविध स्टेज शो करतो त्यावर चित्रित केलंय. समाजाला, व्यवस्थेला प्रश्न विचारणारा नायक आपल्याला यात दिसतो. रॉक तालावर असलेलं हे गाणं थिरकायला लावतंच पण गाण्यातील शब्द आपल्याला विचार करायलाही भाग पाडतात. 

१०) द डिक्टोमी ऑफ फेम (Instrumental) - पैसा, प्रसिद्धी सर्व काही त्याला मिळत असत. जॉर्डन किती प्रचंड लोकप्रिय आहे हे आपल्याला त्याला पाहून बेशुद्ध होणाऱ्या मुलींना बघून कळतं. कॉलेजचे जुने मित्र आता तो लोकप्रिय झाल्यामुळे त्याला भेटायला येतात, तिथे सर्वजण फोटोस काढतात पण त्याचाही त्याला राग येतो. अश्यातच धिंग्रा सोबतच नवीन काँट्रॅक्टचे पेपर तो फाडून धिंग्रांच्याच अंगावर फेकतो. जॉर्डनच विक्षिप्त वागणं हे सुरूच असत. त्याची मुलाखत घेणारी पत्रकार (अदिती राव हैदरी) शी जवळीक साधताना हि तो हीर ला विसरू शकत नाही. खटाना भाई ने कॉलेजच्या वेळेला सांगीतलेल "दिल टूटना जरूरी होता है" हे त्याला तेव्हा लक्षात येत कारण हीर साठी त्याच दिल खरंच खूप आतून तुटलेलं असत.

हे गाणं रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये चित्रित झालेलं आहे. शहनाईवादक उस्ताद जमील खान यांची शहनाई आणि जॉर्डनची गिटार यांची अप्रतिम अशी जुगलबंदी यात बघायला मिळते. यात स्व. शम्मी कपूर यांनी केवळ डोळ्यांमधून जे भाव दाखवले आहे ते वर्णन करण्या पलीकडे आहे. आजोबा आणि नातू याना एकच फ्रेम मध्ये बघायला खूप छान वाटत. 

११) नादान परिंदे - दरम्यानच्या काळात हीर ला कॅन्सर असल्याचे निदान झाल्यामुळे ती तिच्या आई-वडिलांकडे भारतात परत येते. एका शो दरम्यान हीर ची लहान बहीण जॉर्डन ला हे सांगते. जॉर्डन परत येऊन हीर ला भेटतो. हीर ची हालत अत्यंत नाजूक असते. पण जॉर्डन आल्यामुळे ती हिरुफिरू लागते. तिचे पालकही तिची सुधारलेली परिस्थिती बघून सुखावतात. अश्यातच जॉर्डन तिला हवापालटासाठी बाहेर घेऊन जातो. परत आल्यावर तिची तब्येत बिघडते, तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे लक्षात येते. त्याच परिस्थितीत तिचा मृत्यू होतो. या सगळ्यांसाठी अर्थातच जॉर्डनला जबाबदार धरले जाते.

रॉक संगीतात असलेलं हे गाणं. जबरदस्त ऊर्जा घेऊन येत. पण गाण्यातले बोल हे आर्त भावना दर्शवितात. प्रेयसी गेल्याच्या दुःखात असलेला प्रियकर ह्रिदयाच्या आतून सार दुःख पचवून गातोय, बघायलाच विलक्षण वाटत. बाकी रहमान ने नेहमीप्रमाणे यात आपली पाहुणा गायक म्हणून हजेरी लावलीय. त्याची नुसती हजेरीच गाण्याला कडक बनवायला पुरेशी असते. मोहित चौहानने नेहमीप्रमाणे चाबूक गायलंय. 

१२) तुम हो आणि तुम को - चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली मध्ये हे दोघी गाणी फ्लॅशबॅक सोबत एकत्र करून दाखविली आहे. मुळात चित्रपटाच्या ऑडिओ अलबम मध्ये हि दोघी गाणी वेगवेगळी आहे.

तुम हो - सिनेमातील प्युअर रोमँटिक असं गाणं, मोहित ने अप्रतिमरीत्या गायलंय. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी या गाण्यात दिसतात. मोहित चौहान ला परद्यावरचा रणबीर कपूर चा आवाज करून रहमान ने अजरामर केलय. साक्षात रणबीरचा गातोय अस वाटावं इतकी दोघांची केमिस्ट्री जुळून आलीय. सिनेमातील रणबीरची सर्व गाणी मोहित चौहानकडून गाउन घेतल्याने रणबीर च्या सिनेमातील व्यक्तिमत्वाशी आपल्याला सांगड घालता येते.

तुम को - तुम हो सारख्याच चालीचं हे गाणं नायिकेच्या दृष्टिकोनातून बघायला मिळत. कविता कृष्णमूर्ती चा स्वर्गीय आवाज आणि तिचे स्पष्ट उच्चार यामुळे हे गाणं थेट काळजाला हात घालतं.


बॉलीवूड मध्ये मुळातच प्युअर म्युझिकल सिनेमे फार कमी तयार झालेले आहे. पण माझ्यासाठी जे पण आहेत त्यात रॉकस्टार हा कायमस्वरूपी आढळपदावर नक्कीच विराजमान झालेला असेल. इम्तियाझ अली, रणबीर कपूर, मोहित चौहान, इर्शाद कामिल आणि ए आर रहमान या पाचही जणांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम या सिनेमात केलय हे मात्र तितकंच खरं आहे.  

शुभम शांताराम विसपुते

Wednesday, September 11, 2019

गर्दीश - एक उत्कृष्ट कलाकृती


प्रियदर्शन या दक्षिण भारतीय दिग्दर्शकाला आपल्याकडे हेरा फेरी, भूलभुलैया यासारख्या विनोदी चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून जास्त ओळखले जाते, पण याच प्रियदर्शनने विरासत, गर्दीश सारखे आशयघन चित्रपट दिले आहे याचीही नोंद घ्यायला हवी. गर्दीश हा निःसंशयपणे भारतीय सिनेमातील बाप मुलाच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

पोलीस खात्यात असणारे पुरुषोत्तम साठे (अमरीश पुरी) हे एक प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ अशे सिनिअर कॉन्स्टेबल आहे. ज्यांची आपल्या मुलाला शिवा  (जॅकी श्रॉफ) ला पोलीस अधिकारी म्हणून बघण्याच स्वप्न आहे. शिवा हि वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तिकडे विद्या (ऐश्वर्या) ला आपल्या स्वप्नातला राजकुमार शिवा च्या रूपात भेटला आहे हे ती तिच्या वडिलांना पृथ्वीराज भल्ला (शम्मी कपूर) यांना सांगते, तिचे वडील शिवाच्या वडिलांशी बोलणी करून दोघींचा विवाह निश्चित करून टाकतात. शिवा पोलीस झाल्यावर धुमधडाक्यात लग्न करण्याचं त्यांचं ठरत. शिवाच्या कुटुंबात त्याची आई वडील यांच्याशिवाय त्याची लग्न झालेली बहीण आणि तिचा रिकामटेकडा नवरा (असरानी) हे आहेत. एक सध्या सरळ मध्यमवर्गीय कुटुंबातला शिवा पोलीस अधिकारी होण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतो. अश्यातच आमदाराच्या मुलाला हटकल्यामुळे पुरुषोत्तम साठे यांची बदली शहरातील कुप्रसिद्ध अश्या काला चौकी पोलीस स्थानकात होते. इथेच एंट्री होते ती सिनेमाच्या खलनायकाची, बिल्ला जलानी (मुकेश ऋषी) हा अत्यंत क्रूर, रांगडा मस्तवाल असा माणूस जो त्याला नडला त्याला चिरडुनच टाकेल अशे भाव ठेवून वावरणारा असतो. एका प्रसंगात पुरुषोत्तम साठे हे बिल्ला च्या माणसांना भर बाजारात ठोकून काढतात,बिल्लाही तिथे हजर असतो तो येऊन त्यांच्यावर हात टाकतो त्याचवेळेला शिवाही तिथे येतो वडिलांना होत असलेली मारहाण बघून संतापात बिल्लाला ठोकून काढतो इतका कि बिल्ला मारायला टेकतो. हे बघून बिल्लाच्या दहशतीखाली असलेले वस्तीतले लोक शिवाला खांद्यावर उचलून जल्लोष करतात. पण याचा शिवाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. शिवाने बिल्लाला मारल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते याचा गैरफायदा वस्तीमधील स्थानिक गुंड काली आणि शिवाच्या बहिणीचा रिकामटेकडा नवरा घेतात. ते लोकांना शिवाच्या नावाने त्यांच्याकडून खंडणी उकळणे, धमक्या देणे अशे काम करतात. पुरुषोत्तम साठे यांच्याकडे बघून वरिष्ठ पोलीस अधिकारी (सुरेश ओबेरॉय) आपल्याकडून शक्य तितकी मदत शिवाला करीत असतात. शिवाच्या वडिलांनी आपल्या प्रामाणिक स्वभावानुसार त्याला आरोपी ठरवून टाकलेलं असत. शिवाला घरातून काढून टाकल्यावर तो शांती (डिम्पल कपाडिया) या वेश्येच्या घरी राहतो. दरम्यानच्या काळात त्याच ठरलेलं लग्न हि मोडते . शिवाही जेव्हा वडिलांशी बोलायला जातो तेव्हा नेमकं सगळं उलट होऊन त्यांचा गैरसमज आणखी वाढेल अश्या घटना घडतात. दुसरीकडे बिल्लाही मरणाच्या दारातून परत आलेला असतो आणि बदला घेण्यासाठी आसुसलेला असतो. शेवटी बिल्ला आणि शिवा मध्ये हाणामारी होऊन शिवा बिल्लाला कायमचा संपवतो.

एक साधी सरळ गोष्ट जरी असली तरी वेगवान पटकथा असल्यामुळे संपूर्ण चित्रपट आपल्याला बांधून ठेवतो. प्रियदर्शन आपली दिग्दर्शकीय पकड संपूर्ण सिनेमावरून अजिबात सैल होऊ देत नाही.  संतोष सिवन यांची जबरदस्त सिनेमॅटोग्राफी सिनेमाला अजून सुंदर बनवते. संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या जबरदस्त जोडीमुळे सिनेमातील गाणी श्रवणीय झाली आहेत. खासकरून एस पी बालसुब्रमनियम ने गायलेले "हम ना समजे थे, बात इतनी सी" हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्ट मध्ये स्थान राखून आहे.

कलाकारांबाबत बोलायचं झालं तर, हा सिनेमा जॅकी श्रॉफ च्या आजवरच्या कारकिर्दीतला त्याचा सर्वोत्तम अभिनयासाठी लक्षात ठेवायला हवा, इतका उत्कुष्ट अभिनय त्याने केलाय. त्याच प्रामाणिक असणं, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणं, प्रेयसीसोबत भावी आयुष्याची स्वप्न रंगवणं, अन्यायाविरोधात पेटून उठणं, अनावधानाने झालेल्या कृत्याबद्दल मनातल्या मनात झुरणं या सर्व छटा जॅकी ने ताकदीने रंगवल्या आहे. त्याच वर्षी आलेल्या "बाजीगर" मधल्या शाहरुखने आणि यातल्या जॅकी ने मोठ्या फ्रेमच्या चष्म्यातून रसिकांवर जादू केली होती. अमरीश पुरी हा खरोखरच अभिनयातला "बाप" आहे हे त्यांनी या सिनेमातून दाखवून दिलय. मुलावर असलेलं प्रेम, आपल्या नोकरीतील कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, शेवटी मुलाला ठोकलेला कडक सॅल्यूट ही त्यांच्या अभिनयाची परिसीमा होती. इतर कलाकारांच्या भूमिका जरी लांबीने लहान असल्या तरी त्यांच्या चांगल्या कामामुळे लक्षात राहतात. अजून भाव खाऊन जातो तो सिनेमाचा खलनायक मुकेश ऋषी फार कमी संवाद असूनही केवळ त्याच्या नजरेच्या जरबेने त्याने भूमिका जिवंत केलीय.

बाप मुलाच्या नात्यावर फार कमी सिनेमे आलेत. त्यात गर्दीश हा खरोखरच कायमस्वरूपी लक्षात राहील इतका सुंदर सिनेमा आहे.

शुभम शांताराम विसपुते  

Tuesday, September 3, 2019

गायकांचा कॅमीओ



मुख्य गाण्यात फक्त एखादी ओळ किंवा आलाप गाण्यासाठी दुसरा एखादा गायक/गायिका येऊन पूर्ण गाण्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो, त्यातही मुख्य गायकांबरोबरच कॅमिओ करणारेही लक्षात राहतात. यातीलच काही निवडक गाणी...

१) सोनू निगम चा गजनी मधल्या "हे गुझारिश" गाण्यातला आलाप

२) स्वर्णलता चा पुकार मधल्या "सुनता है मेरा खुदा" मधला हुमिंग साउंड

३) रहमान चा युवा मधला "कभी नीम नीम" गाण्यातला कॅमिओ

४) के के चा देवदास मधील "हे डोला रे" हे फक्त तीन शब्द आणि आलाप

५) शंकर महादेवन परदेस मधील "ये दिल दिवाना" मधला आलाप

६) सोनू निगम चा तुम बिन मधील जगजीत सिंग साहेबानी गायलेल्या "कोई फरियाद" मधला आलाप

७) सुखविंदर चा ताल मधल्या "नही सामने तू" गाण्यातील फक्त प्रेयसी हा शब्दावरची तान

८) रहमान ची बॉम्बे मधील "केहना हि क्या" गाण्यातील सरगम

९) परदा हे परदा गाण्यातील किशोर कुमार यांनी म्हटलेली "तो अकबर तेरा नाम नाही है" हि एकच ओळ

१०) 'फना' मध्ये चांद सिफारीश गाण्यात कैलाश खेरनं गायलेलं 'सुभानअल्लाह'

११) जब वी मेट मधील हम जो चलने लगे गाण्यातील उस्ताद सुलतान खान यांची तान

१२) कोई जाए तो ले आये मधलं,शंकर महादेवन ने म्हटलेलं "मारा रे,,,,"

१३) स्वदेस च्या यूं ही चला चल मध्ये हरीहरन चे योडलिंग

१४) तमाशा मधलं 'तु कोई और है' आणि रॉकस्टार मधलं 'और हो' ह्या गाण्यांमधला अल्मा फेव्हरेक चा कॅमिओ

१५) रोजा मधील छोटी सी आशा गाण्यातील रहमान चा कॅमिओ

१६) दिल से मधील सतरंगी रे गाण्यातील कविता कृष्णमूर्ती चा आलाप

१७) कभी अलविदा ना कहना च्या मितवा मधील शंकर महादेवन ची सुरुवात आणि मधली सरगम...

१८) लगान च्या मितवा मधील सुखविंदरचं "हर संत कहे साधु कहे, सच और साहस है जिसके मन में, अंत में जीत उसीकी रहे"

१९) हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या गाण्यातील डोमिनिक या गायिकेने गेलेला ऑपेरा स्टाईल आलाप

२०) लकिर मधील सदिया गाणं, हरिहरन आणि उदित नारायण मुख्य गायक पण कैलाश खेर ने फक्त "सदियाँ सदियाँ सदियाँ रे" एवढंच गायलंय

२१)  RHTDM च्या "चुराया रे" गाण्यात शेखर रावजीयानी च्या केवळ "रहना है तेरे दिल में" या लाईन्स

२२) रोजा जानेमन गाण्यातील सुरुवातीचा आलाप सुजाता मोहन यांनी गायला आहे 

२३) अरे रफ़्ता रफ़्ता देखो आँख मेरी लड़ी है गाण्यात  "ये तुम क्या कह रहे हो ? मैने ऐसा तो नहीं कहा था" इतकंच म्हणणाऱ्या उषा खन्ना

२४) बडे अच्छे लगते है गाण्यात फक्त "और" म्हणणारी सुषमा श्रेष्ठा 

शुभम शांताराम विसपुते