Wednesday, August 28, 2019

उदित नारायण



मी अगदी लहानपणापासूनच याचा फॅन आहे. मधाचं बोट चाटून गाणं म्हणतोय असं वाटावं इतक्या गोड गळ्याचा हा गायक. कॉलेजला असताना तर तो जास्तच आवडायला लागला. कॉलेजला माझा मित्र राकेश कट्टर कुमार सानू समर्थक तर मी उदित नारायण क्लब चा मेम्बर. त्यामुळे कुमार सानू आणि उदित नारायण मध्ये जशी मैत्रीपूर्ण स्पर्धा होती, तशी आमच्यातही होतीच. सानू जरी उदित च्या तुलनेत लोकप्रिय असला तरी माझा ऑल टाईम फेव्हरेट हा उदीतच...

मूळचा नेपाळ चा असलेला "उदित नारायण झा" साधारणतः ८० च्या दशकात मुंबईत आला. गाण्याची आवड त्याला लहानपणापासूनच होती, हीच आवड त्याला मुंबईत घेऊन आली. आपलं पाहिलंच गाणं त्याने साक्षात मोहंमद रफी यांच्याबरोबर केलं, पण तरीही हवी तशी ओळख आणि काम काही त्याला मिळत नव्हतं. स्थिरस्थावर होण्यासाठीचा संघर्ष सुरूच होता. त्यासाठी उजाडावं लागलं १९८८ साल, या साली एक चित्रपट आला ज्याने दोन सुपरस्टार्स ला जन्म दिला एक आमिर खान तर दुसरा उदित नारायण आणि  तो सिनेमा होता "कयामत से कयामत तक". या सिनेमानंतर उदीतच्या यशाचा आलेख वाढतच गेला. त्याचे समकालीन प्रतिस्पर्धी असलेल्या कुमार सानू, अभिजीत वर किशोर कुमार चा असलेला प्रभाव जाणवायचा त्या तुलनेत उदितच्या आवाजावर कुणाचा प्रभाव कधी जाणवला नाही इतका तो अस्सल आहे. भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या "पदमभूषण" ने उदीत नारायणाचा गौरव झालेला आहे. मूळचा नेपाळचा असलेल्या गायकाला भारताचा नागरी पुरस्कार मिळणे हि खरच सन्मानाची गोष्ट आहे. तसेच गाण्यासाठीच्या ३ राष्ट्रीय पुरस्कारांचा मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात आहे. त्याने केलेला अजून एक विक्रम म्हणजे तीन वेगवेगळ्या दशकात (८०,९० आणि २०००) तीन फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेला तो एकमेव गायक आहे.

उदीतने जवळपास सर्व भाषांत, सर्व प्रकारची गाणी गायली. गझल हा गायला कठीण असलेल्या प्रकारातही त्याने उत्तम गझल्स गायल्या. त्यात घर से निकलते हि (पापा केहते है), जादू भारी आँखो वाली सुनो (दस्तक), एक चांद सी लडकी (देवदास) या त्याच्या प्रमुख गझल्स. उदीतला जरी आमिरचा पडद्यावरचा आवाज मानलं जात असलं तरी मला वैयक्तिक त्याच शाहरुख आणि ह्रितिक सोबत असलेल कॉम्बिनेशन फार आवडत. या दोघांसाठी खूप सुंदर अशी गाणी त्याने गायली आहे. तीच गोष्ट रहमानच्या बाबतीत उदीतने अनेक संगीतकारांबरोबर खूप चांगलं काम केलं असलं तरी रहमान सोबत असलेलं त्याच ट्युनिंग जबरदस्त आहे. रहमान ने त्याच्या आवाजाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून अनेक उत्तमोत्तम गाणी दिली आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अशी क्या करे या ना करे (रंगीला), ए अजनबी (दिल से), ओ मितवा (लगान), ताल से (ताल), ये तारा वो तारा (स्वदेस). स्वदेस मधीलच एक गाणं आहे "आहिस्ता आहिस्ता" रहमान आणि उदित या जोडीचं मास्टरपीस असलेलं हे गाणं, अंगाई गीत या प्रकारातलं आहे. ऐकताना सहज सोपं वाटत पण म्हणताना अतिशय कठीण असलेल्या गाण्यात उदितने कमालीचा सूर आळवला आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान या गायिकांसोबतची त्याची डुएट्स गाणी कमालीची लोकप्रिय आहेत. उदितचा आवाज फक्त रोमँटिक गाण्यांना सूट होतो, "दर्दभरे" गाण्यांना नाही हाही एक आरोप होत असतो, पण त्याने गायलेली विरह गीते हर पल याद तेरी (राजा हिंदुस्थानी), क्यू किसी को (तेरे नाम) ही दोन गाणी या आक्षेपाच खंडन करायला पुरेशी आहे. 

आज उदित वयाच्या ६३ व्या वर्षातही तितक्याच प्रेमाने गातोय. वाढत्या वयाचा त्याच्या आवाजाला स्पर्शही झालेला नाहीये. याच उदाहरण म्हणजे नुकत्याच आलेल्या ह्रितिक च्या सुपर ३० सिनेमातील "जुग्राफिया" हे गाणं. गाणं ऐकताना असं वाटतं की अजूनही तोच ९० च्या दशकातला उदित गातोय.  सध्या नवीन संगीतकारांना नवे गायक हवे असतात. उदित आजही रणबीर, आयुष्मान, रणवीर यांना आवाज देऊ शकतो इतका त्याचा आवाज फ्रेश आहे. नेटफ्लिक्स च्या लव्ह पर स्क्वेअर फीट या सिनेमात विकी कौशल साठी तो ऑलरेडी गायलाय. बहुतांशी ऑटो ट्यून वाल्या गायकांच्या तुलनेत अस्सल खणखणीत आवाज असलेल्या उदीतला संगीतकार जास्त संधी का देत नसतील काय माहित. स्वतःच्या आवाजाच्या बळावर सिनेमाच्या अलबम मधील सर्व गाणी गाणाऱ्या उदीतचं आज एखाद्या सिनेमातील एखाद गाणं ऐकायला त्याच्या चाहत्यांनाही आवडणार नाही हेही तितकंच खरंय.

गेल्या तीन दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा गायक, यापुढेही असाच उत्तम गात राहो. हीच मनोमन इच्छा...!!!

शुभम शांताराम विसपुते 

Tuesday, August 27, 2019

गली बॉय



        यावर्षीचा बॉलीवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे "गली बॉय". झोया अख्तर ने दिग्रसहित केलेला हा सिनेमा, या अगोदरच्या तिच्या "जिंदगी ना मिलेगी दोबारा" आणि "दिल धडकने दो" पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. झोयाने या दोघी सिनेमात श्रीमंतीची पार्श्वभूमी आणि विदेशाची सफर घडवून आणलेली आहे तर गली बॉय थेट मुंबई च्या धारावी मध्ये घडविला आहे. संगीताच्या "रॅप" या प्रकारावर बेतलेला हा चित्रपट, प्रामुख्याने "नाझी" आणि "डिव्हाईन" या प्रसिद्ध रॅपर यांच्या जीवनातल्या महत्वाच्या प्रसंगांवर आधारित आहे. 
          सिनेमाचा नायक मुराद (रणवीर सिंग) हा पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याचे वडील आफताब (विजयराज) हे ड्राइवर आहे, त्यांनी अगदी मुरादच्याच वयाची दुसरी बायको करून आणली आहे. घरात अगोदरच मुरादची आई (अमृता सुभाष) असताना, मुरादच्या आजीने (ज्योती सुभाष) त्याच्या वडिलांना दुसरी बायको करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याला लहान भाऊ सुद्धा आहे. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला मुराद आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर काहीतरी लिहीत असतो. त्याच्या आईवडिलांची इतर सर्वसामान्यांप्रमाणे मुरादने त्याच पदवीच शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी अशी इच्छा आहे. मुरादची एक बालपनापासूनची प्रेयसी पण आहे सफीना (आलीया भट्ट) जी मेडिकल ची विद्यार्थिनी असून, मुराद वर जीवापाड प्रेम करणारी आहे. एके दिवशी वडिलांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या जागी बदली म्हणून मुराद जातो. तिथे डिस्को च्या बाहेर उभा असलेल्या मुराद ला केवळ त्याच्या कपड्यांवरून आत प्रवेश मिळत नाही, तेव्हा समाजातील असमानतेवर तो गीत लिहितो. पुढे त्याची ओळख एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) बरोबर होते. एमसी शेर त्याला रॅप मधले बारकावे समजावून सांगतो, फक्त शब्द लिहून उपयोग नाही तर ते एका विशिष्ठ लयीत पण लिहिले जायला हवे ही रॅप मधली प्राथमिक शिकवण त्याला एमसी शेर कडून मिळते. त्यानंतर मुराद अंडरग्राऊंड शो मध्ये आपले गाणे सादर करतो शेवटी youtube ला त्याचा गाण्याचा विडिओ टाकतो आणि त्याला जबरदस्त प्रतिसादही मिळतो. यावेळी सिनेमात एन्ट्री होते ती स्काय (कल्की कोईचीन) ची, बर्कली  कॉलेजची विद्यार्थिनी असलेली स्काय मुराद चा youtube ला विडिओ बघून त्याच्याशी संपर्क साधते. त्याला आणि एमसी शेर ला तिच्या नावेदित संगीतकार आणि गायकांवर आधारित प्रोजेक्ट मध्ये सहभागी करते. स्कायने  त्या दोघींना घेऊन धारावीच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल गाणं कमालीचं लोकप्रिय होत. स्काय मुराद मध्ये गुंतत जात असते, मुरादही काही काळासाठी तिच्यामध्ये गुंततो.  सफीनाशी खोट बोलून स्काय सोबत तो वेळ घालवू लागतो. जेव्हा सफिनाला हे कळते तेव्हा ती स्काय च्या डोक्यात बिअर ची बाटली फोडते, पुढे हे प्रकरण पोलिसात गेल्यावर स्कायने सफिना विरोधात तक्रार दाखल करायला नकार दिल्यामुळे हे प्रकरण मिटते. पण याचा परिणाम मुराद वर होतो. त्याला त्याची चूक उमगते. सफिनाशी माफी मागून तो पुन्हा नव्याने आपले नाते सुरु करतो. रॅपर म्हणून जम बसवत असताना मुरादचे वडिलांशी कडाक्याचे भांडण होते, यामुळे त्याला आईला आणि लहान भावाला घेऊन घर सोडावे लागते. घर चालविण्यासाठी तो त्याचा मामा आतिक (विजय मौर्य) कडे कामही करतो. त्याचवेळी रॅपर्स साठी मुंबईत मोठी कॉन्सर्ट होणार असते, त्याच्या ऑडिशन साठी मुराद एमसी शेर सोबत जातो. आणि अर्थातच त्याची कॉन्सर्ट मध्ये गाण्यासाठी निवड होते. आणि एका आनंदी क्षणावर चित्रपट निरोप घेतो.
         अभिनयाबाबत बोलायचे झाल्यास सर्वानीच उत्तम काम केलय, रणवीर ने मुराद च्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय. केवळ डोळ्यांचा वापर करत खूप जबरदस्त असा मुराद साकारलाय. आलीयाची सफिना हि मस्तच, आपल्या प्रियकराप्रति जरा जास्तच हळवी असलेल्या प्रेयसीच्या भूमिकेत तिने कमाल केलीय. विजयराज आणि अमृता सुभाष ने मुरुडच्या आईवडिलांचा रोल छानच साकारलाय. चित्रपटात खऱ्या अर्थाने लक्षात राहतो तो सिद्धांत चतुर्वेदी चा एमसी शेर आपला पहिल्याच सिनेमात सिद्धांतने तुफान काम केलय. रणवीर आणि त्याच्या एकत्र सीन मध्ये बर्याचवेळेला तो रणवीरला वरचढ ठरलाय. अन्य लहान भूमिकेत ज्योती सुभाष, विजय वर्मा आणि विजय मौर्य यांनी सुंदर काम केलय. रीमा कागती आणि झोया अख्तर यांचा स्क्रीनप्ले आहे. तर संवाद विजय मौर्य यांचे आहेत. दिग्दर्शनात झोया नेहमीप्रमाणे उत्तम आहे, पूर्ण सिनेमावर तिची पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. गाणी हा या सिनेमाचा आत्मा आहे. बहुतांश गाणी हि स्वतः रणवीर सिंग च्या आवाजात असल्यामुळे गली बॉय उत्तम प्रकारे प्रेक्षकांशी कनेक्ट होतो. रॅप च्या माध्यमातून समाजातील असमानता, कष्टकऱ्यांचे जीवन , गरिबी इ. विषय व्यवस्थितरीत्या मांडले जातात. चित्रपटाच्या शेवटचं ट्रेन सॉंग उत्तम जमून आलय.
          एका सध्या सरळ कथेचा उत्कुष्ट दिग्दर्शन, जबरदस्त संवाद आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय यामुळे एक परिपूर्ण सिनेमा तयार झालाय, आवर्जून बघण्यासारखे काही सिनेमे असतात त्या यादीत गली बॉय चे नाव निश्चितच वर असेल.


शुभम शांताराम विसपुते 

Saturday, August 24, 2019

भारतीय राजकारणातला वटवृक्ष - लालकृष्ण अडवाणी



आजच अरुण जेटली गेल्याची बातमी आली. गेल्यावर्षी अटलजी गेल्यानंतर वर्षभरातच भाजपचे अनंत कुमार, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज आणि आज अरुण जेटली गेले. देशभरात आज भाजपला सोन्याचे दिवस आलेत, त्यात या सर्वलोकांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वासोबतच आज प्रकर्षाने आठवण होतेय ती ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची, कारण हे सर्व त्यांचे राजकारणातील सोबती होते. अटलजी हे त्यांना समवयस्क असल्याने त्यांचे सहकारी होते. तर प्रमोद महाजन, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज हे सर्व त्यांना जुनिअर होते. किंबहुना या सर्व जुनिअर मंडळींना राजकारणाचे बाळकडू याच भीष्मपितामहाने दिले. ज्यांना राजकारणात उभं केलं, मार्गदर्शन केलं आज तेच त्यांचे जुनिअर सहकारी त्यांच्या अगोदर जगातून कायमचे निघून गेले. उतारवयात हा धक्का त्यांना मोठ्या कष्टाने पचवावा लागणार आहे. अटलजींसोबत आधी जनसंघ आणि नंतर भाजप ची स्थापना करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांचे दुसरे राजकीय सहकारी बाळासाहेब हि काही वर्षांपूर्वीच गेले. रामजन्मभूमी आंदोलनावेळी या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण देश ढवळून काढला होता. राजकीज जीवनातला बहुतांश काळ हा विरोधी पक्षात गेला, विरोधी पक्षात राहूनही देशाच्या राजकारणात त्यांनी आपले अढळस्थान स्वकर्तृत्वावर निर्माण केलय. उतारवयात माणूस लवकर भावुक होतो असे म्हणतात. म्हणूनच केंद्रात आपल्या पक्षाचं पहिल्यांदा स्वबळावर सरकार आल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये अडवाणी कमालीचे भावुक झाले होते. प्राणप्रिय असा सहकारी अटलजी आणि जी साक्षात त्यांची मानसकन्या होती अश्या सुषमाजी गेल्यानंतर ते आपले अश्रू लपवू शकले नाहीत. गेल्या सात दशकांपासून भारतीय राजकारणात तळपत असलेला हा नेता आपल्या एक एक करून निघून जाणाऱ्या सहकाऱ्यांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे बघतो आहे.

शुभम शांताराम विसपुते 

Friday, August 23, 2019

रथ चौकातील गणपती...!!!



जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या रथोत्सवातील रथाचे वास्तव्याचे कायम स्वरूपी ठिकाण असलेला चौक म्हणजेच रथ चौक...!!! याच रथ चौकात गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा आहे. रथ चौकात एक नव्हे तर तीन सार्वजनिक गणपती मंडळांचा गणपती बाप्पा स्थापन होतो. हे तिन्ही मंडळ म्हणजेच जिद्दी मित्र मंडळ, श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ आणि दीपक तरुण मंडळ होय. इतक्या वर्षांची समृद्ध परंपरा या रथ चौकातील गणेशोत्सवाला लाभली आहे. या तिन्ही सार्वजनिक मंडळांनी स्व कर्तृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आपली ओळख आणि वैशीष्ट्य निर्माण केले आहे.

जिद्दी मित्र मंडळ (वर्षे ३८ वे) :- गणेशोत्सवात सजीव आरास सादर करण्याची मोठी परंपरा या मंडळाने आजवर अखंड सुरु ठेवली आहे. किंबहुना, शहरातील गणेशोत्सवात सजीव आरास सादर करण्याची सुरुवात या मंडळाने केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर मंडळाने नेहमीच सजीव देखाव्यांमधून आपली समाजाप्रती आणि कलेप्रती आपली बांधिलकी वेळोवेळी सिद्ध केली आहे. यंदाही मंडळाने ऐतिहासिक असा श्री शिवाजी महाराजांच्या काळातील सजीव देखावा उभा केला आहे. मंडळाच्या सजीव आरास मध्ये मंडळातीलच कार्यकर्ते भाग घेऊन आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतात. यातूनच स्व. दिलीप काका परदेशी (श्री साईबाबा), जगदीश निकम (एकलव्य, हिरण्यकश्यप, रांझ्याच्या पाटील), मयूर बारी (शिवाजी महाराज), शुभम विसपुते (भक्त प्रल्हाद) इ. कलाकार परिसरात नावारूपाला आले आहेत. अशी हि समृद्ध परंपरा मंडळाला लाभली असून यात नेहमीच वेगवेगळे विषयांवर देखावे साजरे करून मंडळाने ती जोपासली आहे.

श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ (वर्षे ५७ वे) :- दर वर्षीच्या गणेशोत्सवात भव्य दिव्य गणरायाची मूर्ती स्थापन करणे हे या मंडळाचे प्रमुख आकर्षण आहे. ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या रथाच्या पुढेच या गणपतीची स्थापना होत असते. गणरायाच्या भव्य मूर्तीला साक्षात रथाची पार्शवभूमी लाभत असल्यामुळे मूर्तीची भव्यता नजरेत भरणारी असते. जणू, गणरायाचं प्रभू श्रीरामाच्या रथाचे सारथ्य करतोय असे वाटावे. हे मंडळ शहरातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणपती मंडळातील एक मंडळ आहे.

दीपक तरुण मंडळ (वर्षे ४८ वे) :- सुंदर, विलोभनीय गणेशाची मूर्ती स्थापन करणे हे या मंडळाचे प्रमुख वैशिट्य म्हणावे लागेल. या सोबतच धार्मिक, सामाजिक देखावे हे असतातच. यंदाही मंडळाने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी दर्शनाचा सुदर देखावा उभारला आहे. विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध लेझीम खेळण्यासाठी मंडळ प्रसिद्ध आहे. मंडळात कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने उस्फुर्तपणे लेझीम खेळण्यांची सोबतच लाठी काठी फिरवणे आणि मैदानी खेळाची परंपरा मंडळाने मोठ्या उत्साहाने जोपासली आहे. मंडळात वय वर्षे ७ पासून ते वय वर्षे ७० पर्यंत कार्यकर्ते उत्कृष्टपणे आणि उत्साहाने लेझीम खेळण्यातील आपली कला सादर करतात.

रथ चौकात तीन प्रमुख सार्वजनिक मंडळे असूनही तिन्ही मंडळांनी आपली स्वतंत्र ओळख कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव शहरात निर्माण केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तिन्ही मंडळांनी आपली यशस्वी वाटचाल हि परस्परांप्रती असलेल्या आदर, सन्मान आणि सहकार्याच्या भावनेतून केलेली आहे, यात कुठल्याही प्रकारची द्वेषभावना हि मंडळांच्या कार्यकर्त्यांत नाही हे महत्वाचे वैशिट्य आणि संस्कार ठरतात.
लोकमान्य टिळकांनी यासाठीच तर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या सुरु केला, लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव शहरातील रथ चौकात गेली अनेक वर्षे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि यापुढेही होत राहील, याची एक रथ चौकातील नागरिक आणि या तिन्ही मंडळाचा सदस्य म्हणून मी शहरवासियांना ग्वाही देतो...!!!

शुभम विसपुते
(२०१८)

जळगावातील ढोलपथक...!!!



मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात गणपती विसर्जन तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ढोलपथकांचे लोण हे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. जळगाव मध्येही उत्कृष्ट दर्जाचे ढोल पथक नावारूपाला आले आहेत, येत आहेत. जळगावात याअगोदर विसर्जन मिरवणुकीत मुंबई-पुण्याचे ढोल पथक आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करून गेलेले आहेत. त्यावरूनच प्रेरणा घेऊन आपल्या गावातही मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड असे ढोलपथकं तयार झाले आहेत हे मान्य करावेच लागेल. गेल्या ३-४ वर्षात तरुण मंडळींनी मोठ्या मेहनतीने आणि कौशल्याने पथकं निर्माण करून जळगावातील विसर्जन मिरवणुकीला देखणे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. याचे श्रेय जितके पथकांना आहे तितकेच या पथकांना मिरवणुकीत आपले वादन कौशल्य दाखविण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या गणेश मंडळांचे देखील आहे. जळगावातील पथकांनी शहरात, तालुक्यात तर आपल्या वादनाने भुरळ घातली आहेच परंतु काही पथकांनी तर सीमोल्लंघन करीत थेट परराज्यात (बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) जाऊन पथकाचा तसेच जळगावचा मान वाढवला आहे.

एक पथक उभं करण्यामागे किती परिश्रम घ्यावे लागतात, हे मी स्वतः जवळून अनुभवले आहे. कुठलेही पथक हे एका रात्रीत नावारूपाला येत नाही, त्यासाठी कित्येक दिवस-रात्र ओवाळून टाकून काम करावं लागत. मिरवणुकीत पथकातील मुला-मुलींना पाहून अनेक लोकांना वाटत की यांची तर काय मज्जा आहे, यांना छान-छान कपडे घालून तोऱ्यात मिरवता येतं, यांचे झकास फोटो काढले जातात पण ढोल वादकांचे ढोल वर गोंद थापताना चिकट आणि काळे झालेले हात, १५-१६ किलोचा ढोल कमरेला बांधल्यावर त्याचा शरीरावर पडणार ताण, दोरीचे उमटणारे वळ, ताशा वादकांचे ताशा वाजविताना बोटांवर होणारे आघात, हवेच्या झोताचा अंदाज घेत त्याबरोबरच सुरु असलेल्या वादनाशी मेळ घालत आसमंतात भगवा ध्वज नाचवणारे ध्वजधारी, वादकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून घरच्या माणसांसारखी त्यांची काळजी घेणारे स्वयंसेवक आणि व्यवस्थापक. या सर्वानी मिरवणुकीत मिरवण्यामागे घेतलेली ही मेहनत अनेकांना दिसत नाही. हातातील पाच बोटे हे एकसारखे नसतात पण ते एकत्र आल्यावर तयार होणाऱ्या वज्रमुठीप्रमाणेच पथकातील ढोलवादक, ताशावादक, ध्वजधारी, स्वयंसेवक आणि व्यवस्थापक रुपी पाच बोटं एकत्र आल्यावर उत्कृष्ठ पथक तयार होतं.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणं लागतो हि उदात्त भावना मनात ठेवून ही पथकं आपली सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहेत पथकाला मिळणाऱ्या मानधनामधून काही रक्कम हि पथकं गरजुंना तसेच इतर सामाजिक उपक्रमांना देतात हि निश्चितच गौरवास्पद गोष्ट आहे. यासाठी पथकांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन हि होत असते. पथकांमध्ये फक्त शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच नव्हे तर गृहिणी, व्यावसायिक, नोकरी करणारे हि मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत असतात. आपल्या मागचा कामाचा व्याप सांभाळून हे सर्व कला, संस्कृती जपण्यासाठी झटत असतात. ढोल पथक हा एक उत्सव आहे, एक आनंद आहे या उत्सवाची मजा ही पथकात गेल्यावरच कळते. पथकातील मंडळी हे या उत्सवाच्या माध्यमातून निखळ आनंदाची उधळण करून मिरवणुकीतील आनंद द्विगुणित करण्याचे मोलाचे काम करीत आहे.

सर्व पथकांनी आपसात मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवून सतत नाविन्याचा ध्यास मनात ठेवून नेहमीच आपली वेगळी छाप रसिकांच्या मनावर सोडली आहे. तसेच प्रस्थापित पथकांनी सहकार्याच्या भावनेतून ज्यांना आपले स्वतंत्र पथक उभे करायचे आहे त्यांना पथक उभारिणीतील बारकावे समजावून त्यांना मदत करावी, जेणेकरून ढोलपथकाच्या बाबतीत मुंबई-पुण्याच्या बरोबरीने जळगावचंही नाव घेतलं जाईल ही सदीच्छा व्यक्त करतो. सर्व पथकातील माझ्या मित्र-मैत्रिणींना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

शुभम शांताराम विसपुते 

दामिनी



कधीही बघावा असे काही सिनेमे असतात त्या लिस्टमध्ये 'सनीच्या' एंट्रीनंतरचा 'दामिनी' आहे. मुळात सनीची एन्ट्रीच तब्बल १ तास ४० मिनिटांनी होते, पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणुन संतोषी १ तास ४० मिनीटं कथेत आणि आपल्या कॅरेक्टर्समधे प्रेक्षकाना आपल्याला हव्या त्यापध्दतीने गुंतवुन घेतो.
दामिनीचा कमालीचा प्रामाणीकपणा, उर्मीच्या बलात्काऱ्याना शिक्षा मिळवुन देण्याची एकाकी प्राणांतीक धडपड, तिच्या विरुध्द उभी राहिलेली राजकारणी, धनदांडगे कुटुंबीय, वकील, पोलिसयंत्रणेची दुष्ट फौज, तिच्या वाट्याला आलेली अवहेलना, चारित्र्यहनन, मानसिक शारीरीक छळ, तिचे मानसिक संतुलन हरवेपर्यंतचे हाल...यासगळ्यातुन निभावत ती वेड्याच्या हाॅस्पीटल मधुन पळालेली.. मागे गुंड लागलेले.. ती गुंडाच्या हातुन आता मरतेय अशी वेळ... प्रेक्षक समरसुन नायीकेवरच्या या अन्यायाने घायकुतीला आलेले.. नायीकेईतकेच हतबल झालेले.. संतापलेले..आणि प्रकाशाची तिरीप भेदत नेमक्या वेळी सनीची एंट्री.... जवळपास निम्मा सिनेमा झाल्यावर. तरीही सनी देओल ने 'दामिनी' साठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा "राष्ट्रीय पुरस्कार" मिळविला आहे. तथाकथीत सुशिक्षित याला पाहून नाकं मुरडत असली तरी अस्सल भारतीय पब्लिक चा आवडता असा हा रांगडा हिरो आहे. काही सिनेमे असे असतात ज्या सिनेमा मुळे अभिनेत्याला नवी ओळख मिळते. सनीच्या कारकिर्दीत 'दामिनी' या साठीच महत्वाचा आहे. व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारा "अँग्री यंग मॅन" सनीने जबरदस्त साकारला आहे. एरवी त्याच पडद्यावर ओरडणं हे बऱ्याच जणांना अति वाटत, पण 'दामिनी' मध्ये सनी जी सात्विक चीड दाखवतो ते पब्लिकला जास्त भावतं. सनी देओल ज्या त्याच्या "ऐतिहासिक" डायलॉग्ज साठी ओळखला जातो, त्यातील बहुतेक डायलॉग्ज हे याच सिनेमात आहे. (तारीख पे तारीख, ढाई किलो का हात, जज ऑर्डर ऑर्डर करता राहेगा और तू पिटता रहेगा, ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते है, कदम संभाल रख कदम केस बहुत चिकना है...) सनीने आपल्या दमदार आवाजाने ह्या दमदार डायलॉगस ना न्याय दिला आहे. खरंच त्याचा हात पडला तर आदमी उठ जायेगा असं वाटावं इतपत नैसर्गिक मारामारी तो करतो. सनी यामध्ये आपल्या नेहमीच्या निरागसतेने ‘मै’ म्हणताना स्वत: कडे, ‘तुम’ म्हणताना समोरच्याकडे हात करत, प्रामाणीक एनर्जीने संधी मिळाली की थरकाप उडवणारी गर्जना करत नॅशनल अवॉर्ड घेऊन गेला. या सिनेमात अभिनेत्री (मीनाक्षी) मध्यवर्ती भूमिकेत आहे, तर ऋषी कपूर आणि सनी देओल हे सहायक अभिनेत्यांचा भूमिकेत, अमरीश पुरी सारखा बट उडविणारा कसलेला खलनायक आहे. एक चांगला सिनेमा बनविण्यासाठी ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सर्वच या सिनेमात होत्या. सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय, एपिक डायलॉग्ज, टाळ्या वाजवाव्या असे कोर्टरुम सिन्स आणि अर्थातच राजकुमार संतोषीचं उत्कृष्ट दिग्दर्शन हे सर्वच सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. काही चित्रपटांचं आपल्या मनावर गारुड असतं त्यातलाच एक म्हणजे "दामिनी"!

शुभम शांताराम विसपुते

के के मेनन


माझा अत्यंत आवडता अभिनेता! प्रचंड अभिनय क्षमता पण त्यामानाने दुर्लक्षित असलेला असा नट. के के चा जन्म जरी केरळ चा असला तरी त्याच्या लहानपणापासूनच तो महाराष्ट्रात आहे. नुकताच त्याचा "एक सांगायचंय" हा पहिला मराठी सिनेमा येऊन गेला. के के ला मी सर्वप्रथम बघितला तो अनुराग कश्यप च्या  "ब्लॅक फ्रायडे" या सिनेमात, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित या सिनेमात के के ने मुख्यतापासाधिकारी राकेश मारिया यांची भूमिका केली. अतिशय शांत, संयत असा टिपिकल बॉलीवूडपटातील  पोलिसांपेक्षा वेगळा असा पोलीस अधिकारी त्याने अप्रतिम उभा केलाय. यानंतर मी के के चे जवळपास सर्वच सिनेमे बघितले. अनुराग सोबत के के मध्यवर्ती भूमिका असलेले तीन सिनेमे केले. "पांच", "ब्लॅक फ्रायडे" आणि "गुलाल". या तिन्ही सिनेमात त्याने जे काम केलय ते बघून स्तिमित व्हायला होत. "पांच" हा जोशी-अभ्यंकर या खून खाटल्यावर प्रेरित आहे, ज्यात के के मुख्य भूमिका साकारलीय. "गुलाल" मध्ये तो आपल्याला भेटतो तो अस्सल राजपूत असल्याचा गर्व असलेल्या आणि राजपुताना स्थापन करणाऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या "डुकी बन्ना" च्या भूमिकेत. सिनेमाच्या सुरवातीच्या प्रसंगात जेव्हा तो राजपुतांच्या वेगळ्या राजपुतानासाठी सर्वांसमोर जे भाषण करतो त्या प्रसंगात त्याची भेदक आणि आत्मविश्वासपूर्वक नजर कायमची लक्षात राहते. यानंतर के के ला असाच तडाखेबंद रोल मिळाला तो "शौर्य" सिनेमात, ब्रिगेडियर रुद्रप्रताप सिंग च्या रूपात. यात राहुल बोस सोबतची त्याची जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणीच आहे. क्लायमॅक्स च्या कोर्टरूम सिन मध्ये के के ने जी जबरदस्त संवादफेक केलीय त्याला तोड नाही. जवळपास १६ मिनिटांच्या या सिन मध्ये अभिनयाच्या सर्व छटा तो दाखवतो. "हनिमून ट्रॅव्हल्स प्रा.लि." मधला त्याचा पार्थो हा साधा भोळा बंगाली बाबू पण दारू पिल्यानंतर "सजनादि वारी वारी" या गाण्यात तुफान धुमाकूळ घालतो, या गाण्यातील के के ची एनर्जी पाहून रणवीर सिंग सुद्धा त्याच्यासमोर फिका वाटतो. "सरकार" आणि "दिवार" मध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली, तिथेही त्याने आपले नाणे चोख वाजवले. "मुंबई मेरी जान" मधला हिंदुत्ववादीची सुरेश, "हैदर" मधला खुर्रम मीर, "लाईफ इन अ मेट्रो" मधला बॉस रणजित या के के च्या इतर भूमिका. प्रत्येक वेळी शांतपणे पडद्यावर येऊन आपलं काम चोख करणारा, प्रसिद्धी आणि पैश्यासाठी हपापलेल्या इंडस्ट्री मध्ये प्रसिद्धीपराङ्मुख राहून आपल्या इमानाशी प्रामाणिक राहून काम करणारा. प्रत्यक्ष आयुष्यही अगदी साधेपणाने जगणारा, आमच्या सारख्या त्याच्या कट्टर फॅनने त्याच्या ट्विटर व फेसबुक अकाउंट वर केलेल्या कंमेन्ट्सला लाईक आणि रिप्लाय देणारा हा, खऱ्या जीवनातला सेलिब्रिटी.

-शुभम शांताराम विसपुते