Monday, October 19, 2020

सनी देओल - आमच्या पिढीचा अँग्री यंग मॅन

 



जवळपास अर्धा सिनेमा झालेला आहे. हतबल झालेली नायिका, तिची लढाई, तिला दिला गेलेला त्रास, खलनायकाचं काम करणारी "सिस्टीम". प्रेक्षक म्हणून आपण हे पाहत असतो. कोणीतरी येऊन नायिकेला या सगळ्यातून वाचवायला हवं असं मनोमन वाटत असतं. पण नायिकेवरचा अत्याचार हा वाढत जातो. इतका कि ती वेडी झालीय हे न्यायालयात सिद्ध करून तिला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले जाते. अशातच, दुर्गोत्सवाची मिरवणूक सुरु असताना नायिका इस्पितळातून पळ काढते. तिच्या मागे गुंड लागलेत. जिवाच्या आकांताने ती पळतेय आणि एका बेसावध क्षणी ती एका दारुड्याला धडकते आणि..... 

विस्कटलेले केस, अस्त्याव्यस्त झालेले कपडे, लाल झालेले तारवटलेले डोळे, हातात पकडलेला ओल्ड मंक चा खंबा आणि एका हातात असलेली सिगारेट. बस्स, आता तो आलेला असतो. त्याला बघून आपल्याला वाटतं कि अरे फेक ती बाटली आणि वाचव तिला, पण तो बाजूला होतो. गुंडाना तिला घेऊन जायचा इशारा करतो. दोन जण तिच्या दिशेने यायला लागतात पण हा ढिम्म काही हालत नाही. त्याचा कमालीचा थंडपणा बघत इकडे तिच्या बरोबरच आपणही बैचेन झालेलो असतो. ते दोघे जण जसे तिच्या अंगावर हात टाकायला येतात तेव्हा एका क्षणात तो एक पंच पहिल्याला आणि एक बॅकहॅन्ड दुसऱ्याला ताकदीने लगवतो इतका कि दोघे उठतच नाही. त्या दोघींची हालत बघून इतर तिघे जागेवरच गार झालेले असतात. तो सिगारेट पेटवायला जातो तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या पंजावर लागलेल्या रक्ताकडे जातं. तेव्हाच आसमंतात वीज कडाडते आणि "दामिनी" सिनेमात सनीबाबाची दमदार एंट्री होते. जवळपास १ तास ४० मिनिटांनंतर सनीबाबा आपलं रूप सिनेमात दाखवतो आणि उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर करून सिनेमासहित प्रेक्षकांना तिथेच खिशात टाकतो. 

खरतर आज सनी देओल चा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल खूप काही लिहायची इच्छा होती. माझ्यावर असलेला त्याचा "इम्पॅक्ट" मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यातही दामिनी मधला सनिबाबाने साकारलेला "गोविंद"चा प्रभाव हा आयुष्यभर कायम राहील. त्यामुळे फक्त त्याच्या दामिनीतल्या एंट्री सिन बद्दल लिहिलंय कारण सनी देओल बद्दल लिहायचं म्हणजे काळ, वेळ, लांबी, शब्द या सगळ्या गोष्टी खुज्या पडतात त्यामुळे तूर्तास इतकंच... 

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सनीबाबा....

शुभम शांताराम विसपुते     


Tuesday, October 13, 2020

तुंबाड - हव्यासाची पिढ्यानपिढ्या संक्रमित होणारी गोष्ट

 


"मला असा सिनेमा बनवायला आवडतो जो संपूर्ण जगात कुणीही बघू शकेल, एखाद्या देश किंवा राज्यापुरता मर्यादित राहणाऱ्या विषयात सिनेमा बनवण्याची मला आवड नाही." तुंबाड बघितल्यावर दिग्दर्शक राही अनिल बर्वेच हे वाक्य अगदी शंभर टक्के पटतं. आज "तुंबाड" प्रदर्शित होऊन बरोबर दोन वर्षे होत आहे. तुंबाड बघितल्यावर खरंच असं वाटत होतं की, हा सिनेमा भारतीय नव्हेच. भारतीय पार्श्वभूमी असलेला एखादा जागतिक दर्जाचा सिनेमा आपण बघतोय हीच भावना तुंबाड बघताना होती. माझ्यासारख्या अनेकांना सिनेमा प्रचंड आवडला होता तर बहुतेकांना फक्त पहिला अर्धा तास भीतीदायक वाटला. अर्थात प्रत्येकाची आवड हि वेगळी असते. मी एकट्याने हा सिनेमा थिएटरला बघितला होता. बघून झाल्यावर अनेकांना सांगितलं होतं की, हा सिनेमा थिएटरला जरूर बघा कारण असे सिनेमे पुन्हा पुन्हा नाही येत. तुंबाड हा अनुभवायचा विषय आहे ते ही मोठ्यात मोठ्या पडद्यावर टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल मध्ये बघण्यासाठीचा हा सिनेमा नव्हे.   

कथा आहे साधारणतः १९०० च्या दरम्यानची तुंबाड नावाचं ओसाड गाव. तिथे सतत पडणारा पाऊस. भलामोठा चिरेबंदी वाडा. तिथला पगडी घातलेला घाऱ्या डोळ्यांचा वाड्याचा मालक. गूढ वाड्यामधल्या सोन्याच्या मोहरा. त्याच गावातील एका उंच ओसाड डोंगरावर पडक्या झोपडी सारख्या घरामध्ये राहणारी एक विधवा बाई, तिचा मुलगा विनायक, त्याचा छोटा भाऊ आणि आतल्या खोलीत साखळ्यांनी बांधलेली आणि बिभत्स म्हातारी…!!  चित्रपटाची सुरवात ह्या दृश्यांपासून होते. 

कथा तीन  भागात असल्यामुळे ती थोडी सुटी सुटी वाटते. सुरुवातीला लहानग्या विनायक अन त्याच्या आजीच्या भयानक सीन्स मुळे प्रेक्षकांच्या अंगावर जो काटा येतो तो शेवटपर्यंत उतरत नाही. लहान भावाच्या मृत्यूनंतर विनायक आणि त्याची आई तुंबाड सोडते. विनायकाचा लालची स्वभाव माहिती असल्याने त्याची आई पुन्हा तुंबाड मध्ये परत न येण्याचे त्याच्याकडून वचन घेते. पण विनायक पंधरा वर्षांनी सोन्याच्या लालसेने तुंबाड मध्ये परत येतो. त्या पडक्या घरात जाऊन आजीचा शोध घेतो. तिच्याकडून तो वाड्यातल्या खजिन्याची, देवीची अन तिच्या गर्भात लपलेला मुलगा हस्तरची माहिती मिळवतो आणि शोध सुरू होतो वाड्यातल्या खजिन्याचा. त्याला तिथे सोन्याच्या मोहरा मिळतात. तो तुंबाडला येत जातो अन खजिना मिळवत जातो आणि त्याच राहणीमान सुधारत जातं. त्याची बायको, त्याचा मुलगा पांडुरंग यांच्यासोबत कथा पुढे सरकते. हस्तर कडून सोनं लुटण्याची "कला" विनायक त्याच्या मुलाला पण शिकवतो. बाप से बेटा सवाई या उक्तीप्रमाणे त्याचा मुलगा हा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो. सोन्याचा हव्यासाची कथा अनेक वळणं घेत दोघी बापलेकांना कुठवर घेऊन जाते हे सिनेमातच बघण्यासारखे आहे.   

तुंबाड  जरी "भयपट" (हॉरर) वाटत असला तरी तो भयपटापेक्षा "गूढपट" जास्त आहे. आपल्याकडच्या भयपटाचा जो प्रकार आहे त्या प्रकारात बसणारा हा सिनेमा नाही. सिनेमातल्या म्हातारी किंवा हस्तर पेक्षा विनायक, पांडुरंग यांच्या डोळ्यातील हाव, त्यांची लालसा हि जास्त भीतीदायक आहे. परिस्थिती बदलली तरी माणसाच्या हावरेपणाची प्रवृत्ती तशीच पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाते. चित्रपटात खरंतर ज्याची जास्त भीती वाटायला हवी त्या सीन्स ला प्रेक्षकांकडून "लाफ्टर" येत होता. कारण पडद्यावर दिसणारा हवस, लालसेचा नंगानाच हा कुणाला खुपत नव्हता, हे जास्त भीतीदायक होतं. 

एकाच सिन बद्दल सांगतो, विनायकाचा लहानगा मुलगा पांडुरंग आपली पहिली मुद्रा बापाने घरात "ठेवलेल्या" बाईला दाखवत तिला मस्का लावत असतो. 'बाबा ने तो सिर्फ तुम्हें रखा है, मैं तो तुमसे शादी करूँगा' अशी लालच दाखवतो. तिच्या 'उमर क्या है तुम्हारी' ह्या प्रश्नावर हा पट्ठ्या सोन्याची मुद्रा हातात देतो. 'अब से मैं रहूंगा और कुछ साल बाद तो सिर्फ मैं ही रहूंगा' हे तो जेव्हा तिला म्हणतो तेव्हा ती हवस, लालच याची परिसीमा होती आणि प्रेक्षकांचा त्या सिन ला असणारा लाफ्टर हा खरा "हॉरर" होता.  

दिग्दर्शक राही बर्वे यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. त्याच्या धाडसामुळेच प्रेक्षकांना तुंबाड सारखा अद्भुत सिनेमा पाहायला मिळाला आणि सोबतच सिनेमात विनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम शहा सारख्या निर्मात्याला देखील सलाम, त्याचा अभिनय तगडा आहेच यात वादच नाही, पण ह्या अशा सिनेमावर पैसे लावायला आणि तेवढयाच आत्मविश्वासाने लोकांसमोर आणायला देखील धाडस लागतं. त्यांना उत्तम साथ दिलीये पांडुरंगाच्या भूमिकेतील मोहम्मद समद या बालकलाकाराने  त्याचा अभिनय सुद्धा अप्रतिम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमातील जी जख्ख म्हातारी आहे तिची भूमिकाही मोहम्मद समदनेच साकारली आहे. हॅट्स ऑफ. इतर कलाकारांची कामेही उत्तम झाली आहे.  

तुंबाड मध्ये दाखवलेले लोकेशन्स ही चित्रपटाची सर्वोत्तम बाजू आहे. त्यातील वाडे, अंधाऱ्या खोल्या, विहीर, दरवाजे, कुलुपं, देवीचा शाप असल्याने सतत पडणारा पाऊस या सर्वांचा एकत्रित परिणाम बघताना आपल्यावर होतो. पंकज कुमारच्या कॅमेराची कमाल पूर्ण चित्रपटात दिसते. निव्वळ अफलातून सिनेमॅटोग्राफी आहे. VFX, स्पेशल इफेक्ट्स दर्जेदार झाले आहे. जॅस्पर कीड ने अफलातून असा बॅकग्राऊंड स्कोर दिलाय. सिनेमाच्या गूढतेमध्ये त्याचा बॅकग्राऊंड स्कोर मोलाची भर घालणारा आहे. द अजय-अतुल यांचं केवळ एक गाणं आहे. त्यातही त्यांनी आपलं नाणं चोख वाजवलं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे गाण्याला पहिल्यांदाच अतुल ने आवाज दिला आहे.  

ज्या दिग्दर्शकांच्या सिनेमांची आवर्जून वाट बघावी अश्या दिग्दर्शकांच्या यादीत राही बर्वे ने स्थान मिळवलं आहे. त्याच्या आगामी "रक्तब्रह्मांड" आणि "मयसभा" या दोघी सिनेमांबद्दल उत्सुकता आहे, त्यासाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा. तुंबाड बघितल्यानंतर थेटरमधून बाहेर पडताना अंगावर काटा होता. पुढचे अनेक दिवस चित्रपट डोक्यात होता. एवढा त्या सिनेमाचा माझ्यावर आणि अल्मोस्ट सगळ्यांवर परिणाम झाला. खरच ज्यांना असे वेगळे सिनेमे पाहायला आवडतात त्यांनी आणि प्रत्येक सिनेप्रेमींनी हा तुंबाड बघावाच. 

शुभम शांताराम विसपुते 

Thursday, September 10, 2020

बंदिश बँडीट्स- संगीताच्या प्रेमात पाडणारी प्रेमकथा

 


सध्याचा जमाना वेब सिरीजचा आहे. सस्पेन्स, क्राईम थ्रिलर या पठडीतल्या सिरीज तर दर महिन्याला प्रदर्शित होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यांच्या कालावधीत तर वेब सिरीज हे उत्तम प्रतिसाद मिळवलेलं, मनोरंजनाचं माध्यम ठरलंय. वेळ आणि विषय कशाचीही मर्यादा नसल्याने निर्मात्यांच्या दृष्टीनेही संपूर्ण सार्वभौमत्व. पण या सर्वांहून वेगळा विषय घेऊन गेल्या महिन्यात एक नवीन सिरीज प्रदर्शित झाली आहे. अभिजाततेचा दर्जा असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत याच्या भोवती पूर्ण कथानक असलेली सिरीज आहे "बंदिश बँडिट्स". 

सिरीजच ट्रेलर पहाताना, 'शास्त्रीय संगीतावर आधारित मालिका' असं प्रथमच ऐकण्यात आलं आणि उत्सुकता निर्माण झाली. अर्थात मला शास्त्रीय संगीतातील ज्ञान शून्य पण सर्वप्रकारचे खूप उत्तम संगीत ऐकत असल्याने संगीताबद्दल आवड निर्माण झाली आणि चांगलं संगीत ऐकणारा कानसेन होण्याइतपत समज आलीये.

सिरीजची कथा थोडक्यात अशी आहे, जोधपुरमधील राठोड घराण्याचे संगीत सम्राट पंडित राधे मोहन राठोड (नसीरुद्दीन शाह) यांच्या घराण्यांवर या मालिकेचं कथानक बेतलेलं आहे. त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र (राजेश तैलंग), सून मोहिनी (शीबा चढ्ढा), धाकटा मुलगा देवेंद्र (अमित मिस्त्री) आणि नातू राधे (ऋत्विक भौमिक) असा त्यांच्या परिवार त्यांच्या पूर्वजांच्या हवेलीत रहात असतात. पंडितजी जोधपूरचे गेल्या पंचवीस वर्षांपासून "स्वर सम्राट" असल्याने त्यांना तिथल्या राजघराण्याकडून राजाश्रय (ग्रांट) मिळत असते. हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत. शिस्तप्रिय आणि कठोर असल्याने इतर कुटुंबीय त्यांच्याच अधिपत्याखाली, दबावाखाली वावरत असतात. आपण पंडितजींचे उत्तराधिकारी व्हावे असं स्वप्न मनीषा राधे बाळगून असतो. परंतु अजूनही तो अपरिपक्व असल्याने पंडितजींनी त्याला गंडा बांधलेला नसतो.

याच दरम्यान 'पॉप संगीत' गाणारी तमन्ना(श्रेया चौधरी) आणि राधे यांची भेट जोधपूरमध्ये तिच्याच कॉन्सर्ट मध्ये होते. जेथे अभिजात संगीताची होणारी चेष्टा सहन झाल्याने राधे शास्त्रीय संगीताची एक झलक पेश करतो. त्याच्या गायकीने तमन्ना प्रभावित होते. एका म्युझिक कंपनीशी झालेल्या करारानुसार, तमन्नाला नवीन गाणं तयार करायचे असते. राधेच्या भेटीमुळे "शास्त्रीय आणि पॉप संगीत फ्युजन" याची कल्पना तिच्या डोक्यात येते. राधेचा परिवारही आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने आणि तमन्नाला देखील आपलं गाणं उत्तम व्हावं म्हणून ते सोबत काम करण्याचं ठरवतात. कामानिमित्त त्यांच्या होणाऱ्या गाठी-भेटी, सांगीतिक चर्चा, गीतलेखन, गाण्यांच्या चाली या साऱ्यामुळे हळूहळू त्यांचं प्रेमही फुलायला लागतं.
 
याच दरम्यान पंडित राधे मोहन राठोड, यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा दिग्विजय (अतुल कुलकर्णी), जो एक प्रसिद्ध गायक आहे, अचानक जोधपुरमधे दाखल होतो आणि आपणच राठोड संगीत घराण्याचे खरे वारसदार असल्याचा दावा करतो. त्याच्या या आगमनाने राठोड घराण्याची अनेक रहस्ये हळूहळू उलगडत जातात. किंबहुना बिकानेर संगीत घराण्याची गायकी चोरून पंडितजींनी राठोड घराण्याची स्थापना केल्याचा आरोपही दिग्विजय करतो.

या घराणेशाहीचा खरा वारसदार निवडीसाठी जोधपुर राजघराण्याच्या राजांच्या उपस्थितीत "संगीत सम्राट" चे आयोजन केले जाते. प्रकृतीच्या कारणामुळे  या स्पर्धेत पंडितजी स्वत: भाग घेता, आपला नातू राधेला प्रतिनिधित्व करायला सांगतात आणि त्यानुसार त्याच्या तयारीलाही लागतात. या स्पर्धेत राधेला, आपला काका दिग्विजयशी मुकाबला करायचा असतो. पुढे तयारी करताना काय अडचणी येतात? राठोड घराण्यातील कुठले राज बाहेर येतात? राधे आणि तमन्ना च्या प्रेमाचं काय होत? संगीत सम्राट कोण जिंकत? यासोबतच अनेक ट्विस्ट आणि टर्न घेऊन सिरीज पुढच्या सिझनची हिंट देऊन निरोप घेते.


सिरीजमध्ये  तब्बल ११ गाणी असून सुरुवातीच्या थीम सॉन्ग पासून शेवटच्या जुगलबंदी पर्यंतची ही एकाहून एक सरस अशीच आहेत. शंकर-एहसान-लॉय या गुणी संगीतकार त्रिकुटाचं संगीत आहे. जावेद अलीने गायलेली ठुमरी 'लब पार आयी', शंकर महादेवनच्या आवाजातील 'पधारो म्हारे देस' आणि 'धारा होगी' ही गाणी विशेष लक्षात रहातात. क्लायमॅक्सला पंडित अजय चक्रवर्ती आणि जावेद अली यांनी गायलेली 'गरज गरज' जुगलबंदी. फ्युजन मधलं 'सजन बिन आये ना' हे गाणं पण छान झालंय. शंकर महादेवनच्या आवाजातील विरहगीत 'एरी सखी' तर केवळ अप्रतिम आहे.


कथेपेक्षाही यातील कलाकारांची निवड हि या सिरीजचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. राधे आणि तमन्नाच्या मुख्य भूमिकेत असलेले ऋत्विक आणि श्रेया नावेदित असून दिग्गज कलाकारांपुढे समर्थपणे उभे राहिले आहे. राधेचं गाण्यांवरील लीप सिंक अप्रतिम असं आहे. श्रेयाचा परफॉर्मन्स पण उत्तम आहे. राधेच्या आईच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा भाव खाऊन गेलीय सुरुवातीला साइड कॅरॅक्टर वाटणारी ती पुढे मेन ट्रॅकमध्ये येते. तिचं शांतपणे बोलणं, टिपिकल खानदानी राजस्थानी स्त्री प्रमाणे तीच वागणं सगळंच सुरेख आहे. राधेचा मित्र आणि श्रेयाचा मित्र पण मस्त दाखवला आहे. त्याच्या वडिलांच्या भूमिकेतील राजेश तेलंग यांचंही काम चॅन झालंय. मला राधेचा काका हे जास्त बोलणारं पात्र खूप आवडलं. त्याची तळमळ, असहाय्य असणं, आपल्या कलेचा जड काळजाने सौदा करणे, पंडितजींसोबतचा खीर खातानाचा सिन अमित मिस्त्री या कलाकाराने शानदार केलाय. अतुल कुलकर्णीची एंट्री जरी उशिरा असली तरी तो आल्यानंतरची सिरीजवरची त्याची पकड बघण्यासारखी आहे. अतुल गायकाच्या भूमिकेत खूप देखणा दिसला आहे आणि नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय बोलणार, या वयातही इतका कमालीचा अभिनय करणं खायचं काम नाहीये. साक्षात अभिनयाचं विद्यापीठ असलेला हा कलाकार, कमी डायलॉग असताना  निव्वळ एक्सप्रेशन्सच्या जोरावर आपल्या श्रेष्ठ अभिनयाचं प्रदर्शन करतो.


सिरीज नक्कीच उत्तम आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर आहे. काही त्रुटी पण नक्कीच आहे. पण केवळ संगीतावर असलेल्या प्रेमापोटी बघितली आणि आवडली सुद्धा, त्यामुळे हा संगीताचा आस्वाद किमान एकदा तरी आवर्जून घेण्यासारखा नक्कीच आहे.

शुभम शांताराम विसपुते